Tuesday, 26 February 2019

निखिल वागळेंचे चाललेय काय?



निखिल वागळेंचे चाललेय काय?
नमस्कार निखिल वागळे सर
कालचं आपलं विश्लेषण आवडले पण पटले मात्र नाही. याला कारण म्हणजे ते एकतर्फी झालं. धर्मांध शक्तींना रोखणे हा पेच  नियमितपणे आंबेडकरी पक्षांपुढे टाकण्यात येत असतो.   कॉंग्रेसला धर्मांध पक्षांना रोखायचे आहे म्हणजे नेमके काय ?
उत्तर प्रदेशात सपा बसपा हे मजबूत गठबंधन  भाजपला रोखण्यासाठी समर्थ असताना कॉंग्रेस तिकडे प्रियंका गांधींना उत्तर प्रदेश राज्यापुरते उतरवून आणि राज्यात सर्वत्र उमेदवार  उभे करण्याची तयारी ठेवून कुणाचा फायदा करून देत आहे हा सवाल आज पुरोगामी व धर्मांधताविरोधी शक्तींच्या विचारवंत, तार्किक विश्लेषक आणि पत्रकारांकडून कधीही विचारलेला पहायला मिळत नाही. गेली अनेक वर्षे कॉंग्रेस उत्तर प्रदेशात सपा बसपाच्या विरोधात उमेदवार देऊन भाजपला निसटत्या फरकाने जिंकण्यासाठी हातभार लावत असताना कॉंग्रेस भाजपाला रोखण्याचे काम करते की मदतीचे हा प्रश्न कुणालाच कसा आणि का पडत नाही ?
विधानसभा निवडणुकी आधी मायावतींनी पाचही राज्यात युतीसाठी हात पुढे केला होता. पण अत्यंत अपमानास्पद जागावाटणीचा फॉर्म्युला देऊन बसपाला झुलवत ठेवले. मात्र त्या मायावती आहेत, रामदास आठवले नव्हेत याचा त्यांना विसर पडला. त्यामुळेच बसपाने कॉंग्रेसला धडा शिकवत सर्व  जागेवर उमेदवार उभे केले. भले त्यांना यश अत्यंत मर्यादित मिळाले. मात्र बसपचा मताधार वाढला आणि कॉंग्रेसला त्यांच्या टेकूची गरज पडली. कॉंग्रेसला फक्त हीच भाषा समजते.
रामदास आठवले सारख्यांना ते  याचकाप्रमाणे दरवाजात उभे करत असत. गेल्या सहा निवडणुकांमधे कॉंग्रेसला महाराष्ट्रात लोकसभेला २४  जागा अगदी रडतखडत मिळालेल्या आहेत. अपवाद १९९८ सालचा. त्या वेळी ३८ जागा मिळाल्या. पण त्या वेळी एकत्रित रिपब्लिकन पक्ष कॉंग्रेस सोबत होता.  कॉंग्रेस राष्ट्रवादी युती असो किंवा आख्खे शरद पवार कॉंग्रेसमधे असोत, त्यांना १५, १९, २२, २४ आणि आता निव्वळ पाच जागा मिळालेल्या आहेत.  कॉंग्रेसची ताकद तरी काय आहे ?
कॉंग्रेस म्हणजे मराठा  समाजाने आपल्या स्वार्थासाठी आणि अनिर्बंध सत्तेसाठी महाराष्ट्रात वापरण्याची गोष्ट आहे. राज्यात धनगर १२ टक्के आहेत. बौद्ध १२ टक्के आहेत. मुस्लीम १२ टक्के आहेत. यांची मोट बांधली तर ती ३६% होते. हे  जिंकण्याचे सूत्र आहे. बौद्धांपैकी ६% बौद्ध म्हणून रजिस्टर्ड आहेत तर ६% हिंदू महार म्हणून. रामदास आठवलेंकडे सुरूवातीला ६% मतं होती.
कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस यांच्या एकत्रित मतांच्या बेरजेत आणि सेना भाजप युतीच्या एकत्र मतांमधे केवळ ३% इतकाच फरक असे. आठवलेंमुळे तो फरक निर्णायक ठरत असे. मात्र आठवले एका जागेच्या किंवा विधानपरिषदेच्या बदल्यात सर्व राज्यात कॉंग्रेसच्या पारड्यात ही मतं टाकत असत. आदर्श परिस्थितीत कॉंग्रेसने आठवलेंना सत्तेचा ६% वाटा दिला पाहीजे. मराठा संख्या अनिश्चित आहे. कुणी म्हणतं ३३% आहे. कुणी १६% म्हणतं. अगदी ३३% धरले तरी यातले निम्मे सेना भाजपकडे आहेत. म्हणजेच कॉंग्रेसचा मताधार हा धनगर, मुस्लीम आणि बौद्ध असा राहीलेला आहे.
तर मग कॉंग्रेसने जनसंख्येच्या प्रमाणात कुणब्यांना १२% सत्ता द्यावी, मराठ्यांना १६% द्यावी, बौद्धांना ६ ते १२% द्यावी, इतर अनुसूचित जातींना २%, धनगरांना १२% द्यावी आणि मुस्लिमांना देखील १२%  द्यावी.
या पद्धतीने कधी जागावाटप झाले आहे का ?
पश्चिम महाराष्ट्रात जमीन ९०% मराठा समाजाकडे आहे. सहकारी संस्थांमधे ९९% मराठा आहेत. कारखान्यांमधे ९९% मराठा आहेत. शिक्षण संस्था ९०% मराठा समाजाच्या आहेत. ग्रामपंचायतींमधे कुणबी आणि मराठा हे ओबीसींचं आरक्षण मारून टाकतात. तेच विधानसभेला. इतर समाजाला प्रतिनिधित्व देण्याची दानत कॉंग्रेसमधे नाही.
याचा परिणाम म्हणून पश्चिम महाराष्ट्रात सत्तेच्या माध्यमातून प्रचंड प्रमाणात पैसा मराठा समाजाकडे आलेला आहे.  राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसचा साधा कार्यकर्ता देखील ऑडी कार मधे  फिरतो. आवई उठवून जागांचे व्यवहार पार पाडणे त्यासाठी सत्तेचा वापर करणे हे यांचे तंत्र राहीले आहे. त्यामुळे जमिनीचे भाव २००३ पासून  पुणे जिल्ह्यात १० लाख रूपये एकर पासून ते आज ३० लाख रूपये गुंठ्यापर्यंत गेले आहेत. यामुळे सामान्य माणसाला घर घेता येत नाही.  दुकानांची भाडी न-हे, धायरी, आंबेगाव सारख्या ग्रामीण उपनगरात महिना किमान ५०००० रूपये आहेत. यामुळे मराठा, मारवाडी आणि उच्चवर्णिय पैसेवाले वगळता धंदा करणे कुणाच्या बापालाही शक्य नाही. त्यामुळे बॅंकेकडे जाता येत नाही. बॅंक पहिल्यांदा जागामालकाचा करार मागते.
पोलीस दल जातीयवादी आहे.  कुणी गरीबाने अंडाभुर्जीचा  स्टॉल टाकला की त्याच्यावर कारवाई होते. पण तो कॉंग्रेस राष्ट्रवादीचा असेल तर बेकायदेशीर धंदा चालू राहतो.  त्यांची बांधकामे पडत नाहीत. थोडक्यात सत्तेचा होईल तेव्हढा दुरूपयोग हा एका समाजासाठी केला जातो. ते फक्त गुजराथी मारवाड्यांना मान देतात कारण ते पैसा पुरवतात.
निवडणुकीत मात्र मतं लागतात. ती बौद्ध समाजाकडून येतात. मुस्लिमांकडून येतात. धनगरांकडून येतात. धनगरांना जागृत करण्य़ाचे काम महादेव जानकर गेली ३० वर्षे करत आहेत. त्यांना काय दमदाटी झाली हे बारामती तालुक्यात कुणालाही विचारा. काळूराम चौधरीला बसपाचा बोर्ड बारामतीच्या आमराईत लावला म्हणून काय संदेश गेला हे सुद्धा विचारा.  गेली कित्येक वर्षे धनगर समाज अस्वस्थ आहे. त्यांना भाजपने हेरले आणि जवळ केले.  कॉंग्रेसने मग धनगरांना उमेदवारी देण्य़ाचे नाटक केले आणि अपक्ष मराठा उमेदवार उभा करून त्याला निवडून आणले. हे धनगर समाजाच्या लक्षात आहे.  खडकवासला मतदारसंघात राजेंद्र हगवणे याने बंड केले  म्हणून त्याला उमेदवारी दिली. कुमार गोसावी यांना बंडखोर ठरवले गेले. प्रत्यक्षात विमानाला मत द्या असे मेसेजेस घरोघरी गेले.
आठवलेंना शिर्डीत पाडताना मेणबत्तीपेक्षा उदबत्ती बरी असा प्रचार अजितदादा आणि राधाकृष्ण विखे यांनी केला. परिणामी शिवसेनेचे वाकचौरे निवडून आले. २००९ साली आठवलेंची फसवणूक केल्यावर त्यांनी वेगळा  रस्ता धरला पण मनसेला सेना भाजपची मतं खाण्यासाठी उभे करून त्यांनी मोठा पराभव तेव्हां टाळला.
यालाच धर्मनिरपेक्ष शक्तींना पाठिंबा देणे म्हणतात का ?
या गोष्टी एक पत्रकार म्हणून तुम्हाला नक्की माहीत असतील. प्रश्न  हा ही नाही.
जनता दलाच्या प्रयोगानंतर माझ्या पिढीने भाजप ८८ पर्यंत पोहोचली म्हणून कॉंग्रेसला मतदान केले. कॉंग्रेसने त्याचे पांग खाजगीकरण,  उदारीकरण आणि जागतिकीकरणाद्वारे अनुसूचित जातीचे सरकारी नोकरीतले प्रतिनिधित्व घटवून फेडले.  सरकारी कॉलेजेस वाढली नाहीत. सरकारी शाळांची दुरवस्था केली. शेती उद्ध्वस्त केली.  याचा परिणाम आपण मराठा मोर्चा आणि शेतकरी संपामधे पाहिला. मात्र या दुरावस्थेचे कारण ध्यानात  येऊ नये यासाठी मराठा आरक्षणाचा डाव टाकून एकाच वेळी आपले अपयश झाकणे, बौद्धांच्या विरोधात ध्रुवीकरण करणे आणि भाजपला अडचणीत आणणे असे घाणेरडे राजकारण खेळले गेले.  मराठा मोर्च्याच्या काळात बौद्धांना गावकुसाबाहेर राहू देणार नाही असा प्रचार महाराष्ट्रभर करणारे देव गायकवाड हे फेक प्रोफाईल पुढे मुख्यमंत्र्यांच्या महिला अधिका-याची बदनामी करताना पकडले गेले. पण ते आजही मुक्त आहे. या व्यक्तीने व्हॉट्सअ‍ॅप वरून नाशकात दंगली घडवताना बौद्ध गांवांवर हल्ले चढवले. 
९० च्या काळात देखील  ओबीसींचे लक्ष भरकटवण्यासाठू भाजप संघ परिवाराच्या मंदीर लढ्याला प्रतिक्रिया देऊन त्यांनी अजेण्डे सेट केले. कॉंग्रेस अशा पद्धतीने भाजप सोबत परस्परपूरक राजकारण खेळली.
माझी पिढी बावळट होती. माझ्या आधीची तर भावनिक मूर्ख होती.
त्यानंतर  नाराज घटकांनी वाजपेयींमधे आश्वासक चेहरा पाहिला. त्यांनी खाऊजा धोरणाला गती देऊन त्रेधा तिरपीट केली. त्यानंतर कॉंग्रेसने भाजप आली तर घटना बदलेल असा नारा दिला. या दबावाखाली मायावतींसारख्या मुत्सद्दी राजकारण्यांना कॉंग्रेसला पाठिंबा द्यावा लागला. या काळात अनेक दलितविरोधी निर्णय न्यायसंस्थेद्वारा राबवले गेले. अनेक खटल्यात सरकारने वकीलच दिला नसल्याचे उघडकीला आले. यात न्यायसंस्था अजिबात दोषी नाहीत. सरकारपक्षाने हरण्याचे मनावर  घेतले असेल तर कुणी काही करू शकत नाही.
मात्र ९० नंतर जन्मलेली पिढी हुषार आहे. अभ्यासू आहे. ती या घटनांचे विश्लेषण करते. मी असे म्हणत नाही की ती अजून पुरेशी प्रगल्भ आहे. मात्र ती भावनांवर राजकीय निर्णय घेत नाही. भाजपला रोखायचे म्हणून हे दावे किती फोल आहेत हे या पिढीने स्वत:च्या अभ्यासाने मांडले आहे. कॉंग्रेसशी आघाडी म्हणजे तो पक्ष संपणे यावर ही पिढी अभ्यासपूर्ण बोलते. या पिढीला फसवणे अवघड आहे. या पिढीने रिपब्लिकन पक्षाच्या तमाम गटांपुढे युती करा असा पेच टाकला होता.
आता  युवक जाणतात की थोड्याश्या जागेसाठी समझौता म्हणजे आपले अस्तित्त्व गमावणे. सात आठ जागा निवडून आणल्या तर लोकसभेत कॉंग्रेस किंमत देत नाही  हा इतिहास आहे. कॉंग्रेस का बदलेल याला कोणतेही ठोस कारण  नाही. आठ जागांना पर्याय असणारच आहे. पण आठ जागा कॉंग्रेस देत नाही.
त्यांनी बाळासाहेबांना दोन जागेचा प्रस्ताव दिला होता. १२ जागा देणे मान्य नसणे याचा अर्थ ४८ उणे १२ बरोबर ३६ पेक्षा जास्त जागा  कॉंग्रेस निवडून येण्य़ाच्या स्थितीत असणे. अशी परिस्थिती आहे का ? बाळासाहेबांचा प्रस्ताव अव्यवहार्य होता का ? लक्षात घेतले पाहीजे की तेव्हां बाळासाहेबांसोबत अनेक समाजघटक येऊन जुळत होते म्हणून १२ जागा मागितल्या होत्या. औरंगाबाद आणि सोलापूरच्या  धडकी भरवणा-या सभा झाल्या होत्या.
पण कॉंग्रेसने नाटकं केली. ओवेसी नकोत. कारण काय तर ते धर्मांध आहेत. हेच ओवेसी २०१२ पर्यंत कॉंग्रेससोबत असताना धर्मनिरपेक्ष होते का ?  हे म्हणजे भाजपमधे गुन्हेगार आले की ते पवित्र होतात तसेच झाले की.
ओवेसींनी माझ्यामुळे आघाडी होत नसेल तर मी बाजूला होतो, माझे उमेदवार उभे करत नाही पण  आघाडी होऊ द्या अशी भूमिका घेतली. त्यामुळे कॉंग्रेसची पंचाईत झाली. त्यांचे आपसात जागावाटप चालू होते. उरलेली भीक प्रकाश आंबेडकरांना असे ठोकताळे होते. मात्र प्रकाश आम्बेडकरांनी एव्हाना १२उमेदवार उभे करून दबाव ठेवल्याने  दाती तृण धरून ते राजगृहावर शरण आले. १२ जागा घोषित केल्यानंतर या बैठकीत ३ जागांचा प्रस्ताव देऊन राहुल कुलकर्णींना  टीव्हीवर ८ जागांचा प्रस्ताव दिल्याची बातमी ब्रेक करायला लावली. हे डावपेचाचे राजकारण असल्य़ाने बाळासाहेब त्याला पुरून उरत आहेत.
आता आग्री, कोळी, ईस्ट इंडीयन,  कोल्हाटी, पारधी, रामोशी अशा अठरापगड समाजांनी आणाभाका घेऊन पाठिंबा दिल्यावर कॉंग्रेसची खरंच गरज उरलेली  नाही.  आता एव्हढ्या मोठ्या सभा झाल्यानंतर ८ जागा मागणे म्हणजे पाठिंबा देणा-यांचा विश्वासघात करणे होय.
वंचित आघाडीला पाठिंबा देणारा तरूण वर्ग काही भारीपचा भक्तवर्ग नाही. तो एक सेक्शन आहे. तर आंबेडकरी  राजकारण स्वतंत्र असावे , त्याचा श्रीगणेशा व्हावा अशी इच्छा असणारा सुशिक्षित आणि अभ्यासू युवक आहे. बाळासाहेबांनी या नुकत्याच  जुळलेल्या तरूण वर्गाला सामावून घेत पदं दिली आहेत. त्यांनी हा सूर ओळखला आहे. त्यांच्याशी सुजात आंबेडकर, सौ अंजली आंबेडकर यांनी संपर्क ठेवला. त्यांचे म्हणणे जाणून घेतले आणि त्याप्रमाणे यावेळी सर्व  घडते आहे.  घडणार आहे. नाही घडले तर हा वर्ग अस्वस्थ होईल.
कारण कॉंग्रेसला तीनदा सत्ता दिली. त्यांनी खैरलांजी साठी आम्हाला मोर्चे काढण्याची पाळी आणली.  सोलापुरात घराघरात पोलिसांनी शिरून भीषण लाठीचार्ज   केला. महिलांना केसाला धरून बाहेर ओढले. लहान लेकरांना मारहाण झाली. आम्हाला नक्षलवादी ठरवले गेले आणी उच्च न्यायालयात ज्याची भीती होती तेच झाले. अनेक आरोपी सुटले व फाशीची शिक्षा जन्मठेपेत बदलली. हा खटला अपवाद नाही असा निर्णय आम्ही ऐकला त्याच कॉंग्रेसने निर्भया केस मधे किती तत्परता दाखवली ? आम्ही बघतोय. आम्हाला डोळे आहेत. कान आहेत. एक मेंदू आहे.
खर्ड्याला आगे ला मारले ती  शाळा पवारांची ! मारणारे राष्ट्रवादीचे. सगळे निर्दोष सुटले. २००४ ते २०१३  या काळात ४५०० ऎट्रोसिटीची प्रकरणे दाबली गेली. अनुसूचित जाती आयोगाने २०१३ साली सरकारचे  कान उपटले. मात्र मराठा मोर्च्यात याच नेत्यांनी फक्त ४% प्रकरणे खरी असतात असा उफराटा प्रचार करून आमच्या भळभळत्या जखमांवर डागण्या दिलेल्या आहेत. आमच्या लोकांवर खंडणीचे  गुन्हे आहेत.
माझ्या ओळखीतल्या एका बौद्ध डॉक्टर तरूणीने मराठा तरूणाशी  लग्न  केले. त्याला पाच लाख रूपये क्लिनिक टाकण्य़ासाठी  दिले, जेणेकरून तो सेटल व्हावा. पण त्याचे घरचे येऊन  त्याला घेऊन गेले. त्याचे गावाकडे दुसरे लग्न लावून दिले. त्याचा जाब  विचारायला मेव्हणी एकटी गावाला गेली असता  तिला विहीरीत ढकलून जीव घेण्याचा प्रयत्न आसपासच्या लोकांमुळे हाणून पडला. ती जीव वाचवून पळून आली. या प्रकरणाची फिर्याद नोंदवताना पोलिसांमधला जातीयवाद अनुभवला. या मुलाचे नातेवाईक या भागात राहत असल्याने त्यांनी पोलीस स्टेशन्स मॆनेज केली होती. भाजपचे एक नगरसेवक पोलिसांना सूचना देत होते . आज हे नगरसेवक भाजपचे आंमदार आहेत तर नातेवाईक राष्ट्रवादीचे.
भीमा कोरेगाव मधे भाजप सेने सोबत राष्ट्रवादीचे लोक होते हा माझा स्पष्ट आरोप आहे. गेली १४ महीने आम्ही आरटीआयचे अर्ज घेऊन  फिरत  आहोत. हल्लेखोर सेना भाजपचे होते तरी  ग्रामपंचायती राष्ट्रवादीच्या ताब्यात आहेत. त्यांनी बंद चे ठराव कसे काय केले ?  ज्या घरावरून दगडफेक झाली ती घरं राष्ट्रवादी समर्थक आहेत.
मिरज सांगली दंगलीत जर भिडे सापडले तर आर आर आबांनी  सोडून  देण्याचे कारण काय होते ? प्रतापगडला एकबोटे अफजलखान समाधी तोडायला  गेले तेव्हां तक्रारी करूनही कॉंग्रेस राष्ट्रवादी चे मंत्री ढिम्म  का बसत होते ?
आणि आता तर भिडे हे जयंत पाटलांच्या घरी असतात. कोरेगाव भीमा प्रकरणी वॉरंट  निघाले तेव्हांहॊ होते असे समोर येत आहे.
तर नेमक्या कोणत्या कारणासाठी आम्ही कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसला मतदान करायचे आहे ?
युती केली तर आमची मतं प्रामाणिकपणे पडतात. त्यांची पडत नाहीत. इतक्या वर्षात त्यांना आपल्या मतदाराच्या मानसिकतेत बदल करटा आलेला नाही हे कसले धर्मनिरपेक्षतेच्या आणि पुरोगामित्वाच्या गप्पा मारतात ?
निवडून आल्यावर आम्हाला गुमान खाऊ द्या म्हणून तुम्ही आम्हाला मत द्या हा कुठला खाक्या आहे ? आणि त्यासाठी भाजपचे भय ? ज्याला न मागता पाठिंबा दिला. ज्या पक्षात निम्मे  आमदार कॊंग्रेस आघाडीचे आहेत  त्य़ा पक्षाचे  भय आम्हालाच का ?
मेलेलं कोंबडं ज्याप्रमाणे आगीला भीत नाही त्याचप्रमाणे दलित आणि मुस्लीम आता भाजपच्या भीतीला भीत नाहीत. मुसलमानांना अतिरेकी ठरवणा-या पोलिसी कारवाया कुणी केल्या ? एक निरपराधांची पिढी जेलमधे कुणी सडवली ? श्रीकृष्ण आयोगाला कुणी केराची टोपली दाखवली ? मुंबई दंगली कुणी घडवल्या ? मराठवाडा दंगलीत सेनेला कुणी  फ्री हॅण्ड दिला ?
या प्रश्नांची उत्तरे आम्हाला मिळतील  काय ?
नसतील तर आघाडीचं एकतर्फी प्रेशर प्रकाश आंबेडकरांवर नकोय.
खरा प्रश्न असा हवा होता.
भारतातल्या सर्वात मोठ्या राज्यात कॉंग्रेसचे नेमके काय चाललेय ?
सर्वांचीच धर्मनिरपेक्षता  बाहेर  येईल या प्रश्नाच्या उत्तरात. 
(चाळिशीत असलेल्या पिढीचा प्रतिनिधी असल्याने भावनिकतेचे दोष आहेत. ते मान्य आहेत. त्याकडे दुर्लक्ष करून मुद्दे दखलपात्र वाटले तर कॉंग्रेसची  कान उघाडणी फक्त तुम्हीच करू शकता म्हणून हा प्रपंच. इतरांकडून काडीची अपेक्षा नाही).
- लेखकांचे नाव माहीत नाही, सोशल मीडिया वरुन साभार. ज्यांचा कुनाचा हा लेख असेल त्यांचे आभार, त्यांनी ब्लॉग एडीटर शी संपर्क केला तर त्यांचे नाव लेखाखाली देता येईल.

संदर्भासह स्पष्टीकरण...!

 ** संदर्भासह स्पष्टीकरण...!! " #आजकाल आंबेडकरवादी म्हणवून घेणारे मात्र दलाल प्रवृत्तीचे पोपटासारखे बोलू लागले आहेत". त्याचे स्पष्...