Tuesday, 18 December 2018

ऍड.बाळासाहेब आंबेडकर यांच्या संदर्भातील कुठल्या हि प्रकारच्या अपप्रचाराला बळी पडू नका.

ऍड.बाळासाहेब आंबेडकर यांच्या संदर्भातील कुठल्या हि प्रकारच्या अपप्रचाराला बळी पडू नका.

- संदिप साळवे

बाळासाहेंबा विषयी अप्रचार करणारे हे जास्तीत-जास्त आपल्या पैकीच आहेत. सांगायचंच झालं तर,
१) बामसेफ/मूलनिवासी
२) बी.स.पी.
३) द रिपब्लिकन
४) बी.आर.एस.पी.
५) आपले असणारे पण बीजेपी,काँग्रेस,राष्ट्रवादी,शिवसेना, मनसे, अजून छोटे-मोठे इतर पक्षातले सालगडी.
६) आर.पी.आय.
(अ) गवई गट
(ब) आठवले गट
(क) कवाडे गट
(ड) मनोज संसारे गट
(इ) कुंभारे गट
७) अजून छोटे-मोठे पोठभरू गट
         वरील यादी मधील लोक हे पैश्यासाठी काहीही करायला बसले आहेत. हे आपण सर्वजण चांगल्या प्रकारे जाणतोच. यातील काही जण जहाल मनुवाद्यांचे सालगडी आहेत तर, काही जण मवाळ मनुवाद्यांचे सालगडी. पण आहेत तर मनुवाद्यांचेच सालगडी. यांना बाबासाहेब आणि त्यांचे विचार या पेक्ष्या मोठा पैसा वाटतोय. या लोकांनी बाबसाहेबांच्या नावाने दुकानं मांडली आहेत. हे लोकं खुशाल बाबासाहेब विकू शकतात. यांना कसलं बंधन नाही. बंधन आहे ते फक्त आणि फक्त बाळासाहेब आंबेडकरांना. बाबासाहेब हे बाळासाहेबांचे आजोबा आहेत. बाळासाहेब बाबासाहेबाना तर विकू शकत नाहीत. ( जर कोणाला बाळासाहेबांविषयी काही वाटतच असेल तर, त्यानां मी एक सांगू शकतोय कि,बाळासाहेबांनी बैमानकी करायचं जर ठरवलंच असत. तर सरकार कुणाचं हि असो एखादं मोठं मंत्री पद हे कायम स्वरूपी राजगृहाच्या पायथ्याशी लोळलं असत. ) म्हणूनच वरील यादीतील दलाल लोकं बाळासाहेबांच्या संदर्भात अप्रचार करण्यासाठी कामाला लागली आहेत. बाबासाहेबानी या देशात क्रांती केली आहे. आता या मनुवाद्यांना प्रतिक्रांती करायची आहे. पण प्रतिक्रांतिवाद्यांना रोखून धरणारणा रक्ताचाही आणि विचारांचा हि वारस म्हणजे बाळासाहेब आंबेडकर होय. बाळासाहेबांवर भुकण्या साठी मनुवाद्यांचे वफादार कुत्रे आता तर अधिकच चवताळून उठतील. हे कुत्रे बाळासाहेबांवर वाटतील ते आरोप करतील आता. उदा. १)बाळासाहेबांचं एखादं स्टेटमेन त्यांच्या सोइ नुसार फिरऊन-फारऊन सोशल मीडियावर,प्रिंट मीडियावर वाटलच तर इलेक्ट्रॉनिक मीडियावर देखील प्रसिद्ध करू शकतात आणि करीत सुद्धा आहेत.
२) बाळासाहेबांचे मंदिरातले फोटो,व्हिडिओ आपल्या सोई नुसार वायरल करणं
३) बाळासाहेबांनी स्टेजच्या बॅक साईटला बाबासाहेबांचा फोटो का नाही लावला. शिवाजी महाराजांचा का नाही लावला. याचा का नाही लावला त्याचा का लावला. असं अति ज्ञान पाजळणे.
४) बाळासाहेब इथे का गेले.तिथे का नाही गेले.
५) बाळासाहेबांनी चवकशी आयोगा समोर भिड्याचं नाव का नाही घेतलं. ( त्याच्या आकाच घेतलं तरी )
६) अगोदर काही कामा निमित्त मुख्यमंत्री यांच्या सोबत झालेल्या  भेटीचे जुने फोटो वायरल करून, आता गुप्त भेट झाली म्हणून खोटी-नाटी माहिती वायरल करणं.
       असे अनेक घबाड रचतील व रचत देखील  आहेत या सर्व गोष्टी कडे दूर लक्ष करून एकाच गोष्टी कडे लक्ष केंद्रित करा ते म्हणजे फक्त आणि फक्त आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांचा आदेश अंतिम. आपण योग्य दिशेने मार्गक्रमण करत आहोत.जेव्हा आपला समाज हा विखूरलेला होता तेव्हा आपली कुणीही गंमत करीत होते(नितीन गडकरीचा विडिओ वायरल आहे बघा गंमत करतांनाच)  आता सर्व समाज बाळासाहेबांच्या नेतृत्वाखाली एक झाला आहे, आता बघा याच लोकांना आपली किंमत कळली आहे. हि ताकत आहे सर्वगुण संपन्न असणाऱ्या नेत्याच्या नेतृत्वाखाली येण्याची.
"आता आमची कोणी माकडावानी गंमत करू शकत नाही."
"कारण आमचा सरदारच एवढा दमदार आहे संदीप"
"कि' गंमत करण्याची कोणी हिंमत करू शकत नाही." आपली हि किंमत ओळखा न आता
आपल्या मेंदूला जरा हि डगमगू देऊ नका. आपल्या हिताचा नारा "आता कसं बाळासाहेब म्हणतीन तसं" हा मनातल्या मनात,वेळोवेळी नव्या उमदिनं देत चला. उद्याचा दिवस हा आपलाच आहे. फक्त ऍड.बाळासाहेब आंबेडकर यांच्या संदर्भातील कुठल्या हि प्रकारच्या अप्रचाराला बळी पडू नका.

               --संदीप साळवे,जालना.
                मो.नं.8691955202

जात वैद्यता पडताळणी समित्या की मागासवर्गीयांच्या छळ छावण्या ?

जात वैद्यता पडताळणी समित्या की मागासवर्गीयांच्या  छळ छावण्या ?
राजेद्र पातोडे
जात प्रमाणपत्र पडताळणी हा राज्यातील अनुसूचित जाती - जमाती , विमुक्त जाती, भटक्या जमाती व इतर मागास प्रवर्गासाठी जीवन मरणाचा प्रश्न बनला आहे.जात पडताळणी समित्या ह्या आरक्षित घटका साठी ‘स्लॉटर होम ‘ अर्थात कतलखाने ठरत आहेत.न्यायालयाने दिलेले आदेशही न जुमानता जात पडताळणी समित्या महाराष्ट्रात मनमानी पद्धतीने कामकाज करीत आहेत.बनावट प्रमाणपत्रे असलेली हजारो बोगस लाभार्थी जात पडताळणी समित्यांचे भ्रष्ट कारभारामुळे आरक्षित घटकांचे लाभ हिरावून घेत आहेत. महाराष्ट्रातील जातवैद्यता पडताळणी समित्या ह्या  मागासवर्गीयांच्या छळ छावण्याच बनल्याचे दिसून येत आहे .त्या मुळे जात प्रमाणपत्र पडताळणी कायदा, विविध न्यायालयीन आदेश ,माधुरी पाटील प्रकरण, रक्ताच्या नात्यातील जात वैधतेच्या आधारे कुटुंबातील सदस्यांना मिळणार प्रमाणपत्र कायदा बदल, आणि नुकताच कोल्हापूर महानगरपालिकेतील १९ नगरसेवकांनी विहित कालावधीत जातवैद्यता सादर न केल्याने अपात्र ठरविले ह्या सर्व बाबींचा नेमक्या काय आहेत याचा उहापोह सदर लेखात केला आहे.
जात वैधता प्रमाणपत्र हे विदयार्थी,आरक्षित जागेवर नोकरीत लागलेली व्यक्ती किंवा नौकरी करीत असलेली व्यक्‍ती, आरक्षीत जागेसाठी निवडणूक लढवित असलेली व्यक्ती,शैक्षणिक,सेवा प्रयोजनार्थ तथा निवडणूक यांचे व्यतिरिक्त इतर प्रयोजनार्थ ज्या आस्थापनेकडून अथवा संस्थेकडून लाभ मिळणार आहे. १२ वी विज्ञान शाखेत शिक्षण घेत असतांना,इंजिनिअरींग, फार्मसी, हॉटेल मॅनेजमेंट, आर्किटेक्चर, मेडिकल्स च्या विविध कोर्सेसला,१० वी नंतर व्यावसायीक अभ्यासक्रमातील डिप्लोमा कोर्सेस,MBA/ MCA / BBM / Bsc.Agri ला प्रवेश घेतल्यानंतर विदयार्थी जातवैधतेसाठी अर्ज करु शकतो.(शासन निर्णय ३१ जूलै, २००८ अन्वये) अनुसूचित जातीचा दावा असल्यास १० ऑगस्ट १९५० पूर्वीचा जातीचे पुरावे असणे आवश्यक आहे.विमुक्त जाती / भटक्या जमाती यांचे करीता २१ नोव्हेंबर १९६१ पूर्वीचा जातीचा पुरावा असणे आवश्यक आहे.इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्ग यासाठी १३ ऑक्टोंबर १९६७ पूर्वीचा जातीचा पुराव असणे आवश्यक आहे.त्याच बरोबर इतर राज्यातून महाराष्ट्रात स्थलांतरित झालेल्या अर्जदारांसाठी वर नमूद केलेल्या कालावधीपासूनचा वास्तव्याचा पुरावा आवश्यक आहे.वरील तारखेनंतर इतर राज्यातून महाराष्ट्रात स्थलांतरित झालेल्या व ज्यांचे जात प्रमाणपत्र स्थलांतरित नमुण्यात आहेत ते समितीकडे अर्ज करु शकत नाहीत.असा काहीसा कायदा आहे.
पार्श्वभूमी -
भारत स्वतंत्र झाल्यानंतर १९५०मध्ये सरकारने अधिसूचना काढून अनुसूचित जाती व अनुसूचित जमातींच्या राज्यवार याद्या प्रसिद्ध करून त्यांना विविध सवलती दिल्या. काही जाती-जमातींकरिता विशिष्ट क्षेत्रांचे बंधनही होते. त्यामागे या जाती-जमातींच्या लोकांना इतर समाजाच्या बरोबरीने आणण्याचा उदात्त हेतू होता. राज्यसरकारांनीही या याद्यात समाविष्ट नसलेल्या परंतु मागासलेल्या काही जातींचे विमुक्त भटक्या जाती-जमाती, इतर मागासवर्ग अशी वर्गवारी करून त्यांनाही राज्यस्तरावर सवलती दिल्या.
१९७६मध्ये भारताच्या राष्ट्रपतींनी काढलेल्या अध्यादेशाने विशिष्ट कारणास्तव क्षेत्रबंधन शिथिल केले, परंतु त्यांचा गैरफायदा घेऊन अनुसूचित जाती-जमातींच्या नामसादृशाचा फायदा घेऊन या जाती-जमातींना असलेल्या सवलती लाटण्याचा प्रयत्न हितसंबंधितांनी मोठ्या प्रमाणावर सुरू केला. म्हणून शासनाने तहसीलदार यांनी दिलेली सर्व वर्ग-प्रवर्गांची प्रमाणपत्रे या विषयातील तज्ज्ञांची समाज कल्याण विभागामध्ये राज्यस्तरावर समिती नेमून १९७९मध्ये प्रथमच तपासण्याची प्रक्रिया सुरू केली. त्यावेळी त्या तपासणीचे स्वरूप वैद्यकीय व अभियांत्रिकी अभ्यासक्रमांना प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या प्रमाणपत्रांच्या तपासणीपुरते मर्यादित होते. १९८४ मध्ये आदिवासी विकास विभाग स्वतंत्र झाला. म्हणून अनुसूचित जमातींकरिता या विभागाच्या नियंत्रणाखाली स्वतंत्र समिती नेमण्यात आली. अनुसूचित जाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती व इतर मागास प्रवर्गाकरिता समाज कल्याण विभागांतर्गत असलेली समिती स्वतंत्रपणे कार्यरत राहिली. १९९५मध्ये विशेष मागास प्रवर्गाच्या निमिर्तीनंतर तेही काम समाज कल्याण विभागाच्या समितीकडेच देण्यात आले. या तपासणीचा उद्देश खऱ्या मागासवगीर्यांना सवलतींचा फायदा मिळावा व नामसादृशाचा फायदा घेऊन खोटी प्रमाणपत्रे मिळविणारे शोधून त्यांना फायदा न देणे हा होता. राज्य शासनाने या विषयावर २००० साली कायदा केला. या कायद्याच्या कलम १८ अन्वये आदिवासी विकास विभागाने विधिसंम्मत नियम २००३मध्ये केले, परंतु १२ वर्षांत सामाजिक न्याय विभागाने साधे नियमही केलेले नाहीत. महाराष्ट्रासारख्या राज्याला ही लाजिरवाणी गोष्ट ठरावी.
जात पडताळणी प्रमाणपत्र प्राप्त करणे हा शाळा-महाविद्यालय प्रवेश प्रक्रियेच्या वेळी दरवर्षी ऐरणीवर येणारा प्रश्न असतो. कधी मनुष्यबळाचे कारण देऊन तर कधी अर्जातील तांत्रिक त्रुटींचे कारण पुढे करून हजारो अर्ज प्रलंबित ठेवले जातात. त्याचा थेट फटका मागासवर्गीय विद्यार्थ्यांना राखीव जागांवरील प्रवेश प्रक्रियेच्यावेळी बसतो. विविध शासकीय कार्यालयात राखीव जागांवर नियुक्त झालेल्या कर्मचाऱ्यांनाही त्याच्या जात प्रमाणपत्राची वैधता सिद्ध करावी लागते. ही प्रक्रिया सुलभ व्हावी म्हणून तत्कालीन सरकार आणि विद्यमान सरकारनेही काहीएक प्रयत्न केले नाहीत. उलट सामाजिक न्याय विभागाने ३० जुलै २०११च्या अधिसूचनेने जिल्हास्तरावर राज्यभर ज्या समित्यांची स्थापना केली ती करताना सुप्रीम कोर्टाचे निदेर्श पूर्णपणे दुर्लक्षिलेत. तसेच या समित्या केवळ स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक लढविण्यास इच्छुक असलेल्या उमेदवारांच्या प्रमाणपत्रांची ताबडतोब चौकशी होण्याच्या राजकीय हेतूने विषयाचे तज्ज्ञ नसलेल्या महसूल विभागाच्याच अपर जिल्हाधिकाऱ्यांच्याच अध्यक्षतेखाली नियुक्त केल्यात. हीच त्या विभागाची मूळात चूक होती. विद्यार्थी, नोकरदार, विविध सवलती मागणारे वा इतर गटाकरिता अशा स्वतंत्र समित्या हा विभाग स्थापन केला गेला नाही.  अपवाद वगळता कोणत्याही जिल्हास्तरीय समितीचे अध्यक्ष भारतीय प्रशासन सेवेतील सहसचिव दर्जाचे अधिकारी नव्हते. त्यामुळे या समित्या सुप्रीम कोर्टाच्या निदेर्शानुसार नसल्याने त्या समित्या स्थापण्याचे शासनाचे आदेश बेकायदेशीरच होते. त्याचप्रमाणे या समित्यांनी दिलेली वैधता प्रमाणपत्रेही नियमबाह्य असल्याने न्यायालयानेच ती रद्द केलीत . या तपासणी समित्यांना तज्ज्ञ आणि न्यायिक दर्जा आहे. त्यामुळे न्यायालयेही यांच्या निर्णयात फारसा हस्तक्षेप करीत नाहीत. समितीचे सदस्य विषयातील तज्ज्ञ असल्याने त्यांना सादर पुराव्यावरून दावा खरा की खोटा याचा अंदाज येत असल्याने प्रत्येक प्रकरणाची पोलिस दक्षता पथकाकडून तपासणी करण्याची आवश्यकता नसते व ते करणे केवळ अशक्य आहे. आदिवासी विकास विभागाने केलेल्या नियमात अर्जदाराने सादर केलेल्या पुराव्यावरून समाधान न झालेल्या व शंकास्पद प्रकरणातच पोलिस चौकशीची स्पष्ट तरतूद (नियम १२(२)) मध्ये केलेली आहे व हा नियम न्यायालयाने आतापर्यंत रद्दबातल ठरविलेला नाही. सामाजिक न्याय विभागाने मात्र नियमच केलेले नसल्याने अशी कायदेशीर तरतूद अस्तित्वात नाही.
न्यायालयीन निर्णय : -
जात प्रमाणपत्र पडताळणी संदर्भात सुप्रीम कोर्टाने १९९४ मध्ये 'माधुरी पाटील विरुद्ध अपर आयुक्त व महाराष्ट्र शासन' (विशेष रिट पिटिशन १४७६७/१९९३) प्रकरणात जात प्रमाणपत्र तपासणी समित्यांची रचना, कार्यपद्धती, दक्षता पथकांची स्थापना, त्यांचे कार्य इत्यादी बाबत दिलेल्या ऐतिहासिक निर्णयाने संपूर्ण देशात खळबळ उडाली आणि जात पडताळणीचे महत्त्व आणि गांभीर्य सर्वांना समजले. 'माधुरी पाटील विरुद्ध अपर आयुक्त व महाराष्ट्र शासन' (सिव्हील अपिल क्र. ५८५४/१९९४ विशेष अनुज्ञा याचिका क्र. १४७६७/१९९३) या याचिकेवर सुप्रीम कोर्टाचे न्यायमूर्ती श्री. के. रामस्वामी आणि श्री. एन. व्यंकटचलम यांच्या खंडपीठाने २ सप्टेंबर १९९४ ला एक ऐतिहासिक निर्णय दिला. या निर्णयाची तीन प्रमुख वैशिष्ट्ये होती.जात प्रमाणपत्र देण्याचे तहसीलदार यांचे अधिकार रद्द करण्यात येऊन ते उपविभागीय अधिकारी यांना देण्यात आले.उपविभागीय अधिकाऱ्यांनी दिलेली प्रमाणपत्रे प्राथमिक (Provisional) ठरवून त्यांच्या तपासणीकरिता व ती वैध/अवैध ठरविण्याकरिता तज्ज्ञांची समिती, तिची कार्यपद्धती व रचना याबाबत स्पष्ट निर्देश देण्यात आलेत.या तपासणी समित्यांना सहाय्य करण्याकरिता उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यांच्या अधिपत्याखाली स्वतंत्र पोलिस दक्षता पथक देण्याचे व त्या दक्षता पथकातील अधिकाऱ्यांनी प्रकरणांची तपासणी कशी केली पाहिजे याचेही स्पष्ट निदेर्श दिले.यापूवीर्ही शासनाने वरिष्ठ निरीक्षक दर्जाचे पोलिस अधिकारी, समितीचे अध्यक्षपदी नियुक्तीकरिता वरिष्ठ अधिकारी उपलब्ध नसल्याने कनिष्ठ पोलिस अधिकारी तसेच न्यायाधिशांच्या नियुक्तीस मान्यता मिळविण्याचाही काही वेळा प्रयत्न झालेला आहे, परंतु शासनाची याबाबतची विनंती न्यायालयांनी अमान्य करूनही सामाजिक न्याय विभागाने अशा प्रकारे समित्यांची नियुक्ती करण्याचा घेतलेला निर्णय धारिष्ट्याचाच होता.
आरक्षित जागेवर निवडणूक लढवून निवडून येणाऱ्या लोकप्रतिनिधींना निवडून आल्यानंतर सहा महिन्यांच्या आत जातवैधता प्रमाणपत्र सादर करणे निवडणूक आयोगाच्या कलम ९ अ प्रमाणे बंधनकारक आहे; परंतु विभागीय जात पडताळणी समितीकडून प्रमाणपत्रे मिळण्यास विलंब झाल्याने राज्यातील अनेक लोकप्रतिनिधी अडचणीत आले होते.याच मुद्द्यावर भोर नगरपालिकेच्या नगरसेविका मनीषा शिंदे यांच्याविरोधात उच्च न्यायालयात यासंबंधी याचिका दाखल झाली, ती फेटाळली गेली. त्यामुळे शिंदे यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान याचिका दाखल केली होती. त्याचवेळी कोल्हापूर महानगरपालिकेतील १९ नगरसेवकांनीही सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती.विभागीय जात पडताळणी समितीनेच मुदतीत सुनावणी घेऊन प्रमाणपत्रे दिली नाहीत; त्यामध्ये आम्हा लोकप्रतिनिधींचा काही दोष नाही. तेव्हा आमचे नगरसेवकपद रद्द केले जाऊ नये, अशी विनंती या याचिकेतून करण्यात आली होती. त्यावर सर्वोच्च न्यायालयाने पहिल्या सुनावणीवेळीच तात्पुरती स्थगिती दिली होती.न्या. चल्लामेश्वर यांच्या न्यायालयात सुनावणी सुरू असताना सरकारी वकिलांनी अशाच आणखी काही याचिका न्या. गोगोई यांच्या पीठासमोरही दाखल झाल्याचे निदर्शनास आणून देत, या सर्व याचिकांवर एकत्रित सुनावणी घ्यावी, अशी सूचना केली होती. तेव्हापासून न्या. गोगोई यांच्या न्यायालयात सुनावणी सुरू होती.सुनावणीअंती न्यायालयाने या सर्व याचिका फेटाळून लावल्या. निवडणूक आयोगाच्या नियमांचे पालन करणे हे बंधनकारक राहील; त्यामुळे याचिका फेटाळत असल्याचे न्यायालयाने म्हटले आहे. या प्रकरणात एका सुनावणीवेळी प्रख्यात कायदेतज्ज्ञ कपिल सिब्बल यांनीही कोल्हापूर महापालिकेच्या नगरसेवकांच्या वतीने काम पाहिले होते.
'मंगेश काशिनाथ काशिद विरुद्ध जिल्हाधिकारी सातारा व महाराष्ट्र शासन' याचिका क्र. ८५३/२०१२ व इतर ५७ याचिकांवर मुंबई हायकोर्टाने एकत्रितपणे दि. ४ मे २०१२ रोजी निर्णय दिला होता.सामाजिक न्याय विभागाने ३० जुलै २०११च्या अधिसूचनेने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढवू इच्छिणा-या उमेदवारांच्या जात प्रमाणपत्रांची तपासणी करण्याकरिता केवळ राजकीय हित समोर ठेवून शासनाने राज्यभर जिल्हास्तरावर समित्या नियुक्त केलेल्या होत्या. या समित्यांनी दिलेली हजारो प्रमाणपत्रे रद्द करण्याच्या निर्णयाने संपूर्ण राज्यभर खळबळ उडाली आहे. या विषयावर मोठी व्याप्ती आणि दूरगामी परिणाम असलेला हा दुसरा ऐतिहासिक न्यायालयीन निर्णय होता. याचिका क्र. ८५३/२०१२ वर ४ मे २०१२ रोजी दिलेल्या निर्णयात न्यायालयाने अत्यंत स्पष्ट निर्देश दिलेले आहेत.सामाजिक न्याय विभागाच्या शासन निर्णयाने ३० जुलै २०११ रोजी काढलेले स्थानिक स्वराज्य संस्थेअंतर्गत होणाऱ्या निवडणुकीसाठी उभे राहाणाऱ्या उमेदवारांच्या जात प्रमाणपत्र पडताळणीच्या प्रयोजनासाठी जिल्हास्तरावर समिती स्थापण्याचे आदेश रद्दबातल ठरविलेले आहेत.३० जुलै २०११च्या शासन निर्णयाने काढलेल्या अधिसूचनेद्वारे नियुक्त जात प्रमाणपत्र तपासणी समित्यांना कायद्याचा आधार नसल्याचे व त्या समित्या सुप्रीम कोर्टाच्या निर्देशाविरुद्ध असल्याने कायदेशीर नसल्याचे जाहीर केले आहे.या समित्यांनी दक्षता पथकाच्या अहवालाशिवाय (सामाजिक न्याय विभागाचे नियम व स्पष्ट तरतूद नसल्याने) दिलेली सर्व प्रमाणपत्रे चुकीची असल्याने वैध ठरविता येणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.आणि शेवटी या विशेष गठित जिल्हास्तरीय समित्यांनी दिलेली सर्व प्रमाणपत्रे तीन महिन्यांत परत घेऊन रद्द व नष्ट करण्याचेही निदेर्श दिलेले आहेत.या आदेशांचा परिणाम आज तरी ३० जुलै २०११च्या निर्णयान्वये नियुक्त केलेल्या जिल्हास्तरीय समित्या, त्यांनी केलेले कामकाज व दिलेली प्रमाणपत्रे यापुरतेच मर्यादित असल्याचे दिसून येते.
रक्ताच्या नात्यातील जात वैधतेच्या आधारे कुटुंबातील सदस्यांना वैद्यता प्रमाणपत्र देणे -
जात वैधता प्रमाणपत्र मिळण्यातील अडचणी दूर करणे आणि याबाबतची प्रक्रिया अधिक गतिमान करणे, यासाठी राज्य मंत्रिमंडळाने मंगळवारी निर्णय घेतला. त्यानुसार रक्ताच्या नात्यातील व्यक्तीकडे उपलब्ध असणाऱ्या जातपडताळणी प्रमाणपत्र महत्त्वाचा पुरावा म्हणून ग्राह्य धरण्यात येणार अशी विशेष दुरुस्ती कायद्यात झाली आहे.
अर्जदाराने आपल्या वडिलांकडील रक्ताच्या नात्यातील कोणाच्याही जात पडताळणी प्रमाणपत्रासह अर्ज जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडे सादर करणे आवश्यक आहे. त्यानंतर हा अर्ज डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेच्या (बार्टी) वेबसाइटवर आणि संबंधित समितीच्या कार्यालयातील नोटीस बोर्डावर प्रसिद्ध केला जाईल. त्यावर १५ दिवसांच्या कालावधीत हरकती मागविण्यात येतील. त्यावर कोणताही आक्षेप प्राप्त न झाल्यास अर्जदाराकडे इतर पुराव्यांची मागणी केली जाणार नाहीस. त्यास तत्काळ जात पडताळणी प्रमाणपत्र दिले जाईल. मात्र, आक्षेप नोंदविण्यात आल्यास त्याची एक महिन्याच्या कालावधीत समितीमार्फत चौकशी किंवा तपासणी करण्यात येईल. आक्षेपात तथ्य आढळले नाही, तर अर्जदारास तत्काळ प्रमाणपत्र देण्यात येईल. आक्षेपांमध्ये तथ्य आढळल्यास समितीमार्फत कार्यालयीन पद्धतीनुसार निर्णय घेतला जाणार आहे. या निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी महाराष्ट्र अनुसूचित जाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्ग (जातीचे प्रमाणपत्र देण्याचे व त्याच्या पडताळणीचे विनियमन) नियम-२०१२ मध्ये सुधारणा केली आहे.
मतितार्थ काय तर नियमबाह्य पद्धतीने जात वैद्यता दिली जाऊ शकत नाही, असे सर्वोच्च न्यायालय म्हणते आणि वस्तुस्थिती अगदी उलट आहे.जिल्हावार निर्माण झालेल्या जात प्रमाण पत्र वैद्यता समित्या मध्ये आज रोजी महाराष्ट्रातील जिल्हा जात पडताळणी समित्यांचे १८ अध्यक्ष, २४ संशोधन अधिकारी, १९ समिती सदस्य, २२ स्टेनो व २२ विधी अधिकारी पदे रिक्त आहेत.ह्या समित्या मध्ये कार्यरत अध्यक्ष, उपाध्यक्ष व सदस्य सचिव आणि असेलच तर दक्षता पथकातील पोलीस अधिकारी एवढेच शासकीय कर्मचारी आहेत.  उर्वरीत व्यवस्थापक,संशोधन सहाय्यक,प्रकल्प सहाय्यक – डेटा एंट्री ऑपरेटर , कार्यालय सहाय्यक व विधी अधिकारी ही सर्व पदे मे. ब्रिस्क इंडिया प्रा. ली. शिवाजी नगर पुणे ह्या कम्पनीने नेमलेले खाजगी व अप्रशिक्षित अनुभवहीन खाजगी कर्मचारी आहेत. ब्रिस्क इंडिया ह्या कम्पनीला कोट्यावधीचा कंत्राट देताना कुठलीही निविदा न काढता केवळ उद्योग उर्जा व कामगार विभागाचे शासन निर्णयाचे  आधारे सामाजिक न्याय विभागाने केवळ एक पत्र पाठवून डॉ बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) पुणे च्या वतीने रोजी मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यास दि. १/८/२०१५ रोजी मान्यता दिली.त्यातही धक्कादायक बाब म्हणजे राज्यात ३ लाखाचे वर कुठलेही शासकीय काम असल्यास निविदा काढणे  बंधनकारक करण्यात आले आहे.तसा कायदाच आहे. ब्रिस्क इंडिया ला मात्र विनानिविदा दोन कोटी सत्तर लाखाचा कंत्राट बहाल करण्यात आला.नुसता कंत्राटच बहाल केला गेला नाही तर दोनवेळा करारनाम्याची मुदत संपल्या नंतर मुदतवाद देखील दिली गेली.करारनामा करताना परिशिष्ट २ वर नेमण्यात येणा-या मनुष्यबळाची शैक्षणिक पात्रता ठरविण्यात आली आहे.तसेच मुद्दा क्र. ७ नुसार कंत्राटी कर्मचा-यांचा पुरवठा करताना शासनाच्या धोरणानुसार व आरक्षणाचे नियमानुसार अ.जा.,अ.ज., वि.जा व भटक्या जमाती, इतर मागासवर्ग,विशेष मागास प्रवर्ग आणि अपंग व महिला ह्यांची नियुक्ती करणे बंधनकारक केले गेले होते.ब्रिक्स कंपनीने ह्या दोन्ही नियमांना तिलांजली दिली.नियम धाब्यावर बसवून कर्मचारी नेमण्यात आलेत.ह्या खाजगी खोगीर भरती वर जात पडताळणी समित्यांचे अर्ध न्यायिक कामकाजपूर्ण अनियंत्रित झाले.राज्यात मोठ्या संख्येत जात पडताळणी प्रस्ताव तुंबवून ठेवले आहेत.जात पडताळणी कायदे धाब्यावर बसवून मनमानी निर्णय घेतले जात गेले.आर्थिक रसद पुरविली की पाहिजे ती जात वैद्यता दिली जाते.त्या साठी खाजगी कर्मचारी पुढे करून राजरोस भ्रष्टाचार सुरु आहे. आजोबा पणजोबा पासून अर्जदारा पर्यंत सर्व पुरावे असताना अनेक प्रकरणात वैद्यता नाकरण्यात आल्या आहेत.अशी शेकडो उदाहरणे आहेत.एवढेच नव्हे तर रक्तातील नात्याचे वडील, काका, आत्या, भाऊ  ह्यांचे जात वैद्यता  जोडलेल्या अनेक प्रकरणात देखील अर्जदारांचे अर्ज फेटाळले आहेत.तर एकट्या अकोला जिल्ह्यात ८०० पेक्षा अधिक प्रकरणे  काहीही कारण नसताना दक्षता पथका कडे सोपवून अडवून धरली आहेत.ह्या मध्ये जात वैधता नाकारलेली, त्रुटी काढलेली व दक्षता पथका कडे सोपवून अडवून धरलेली बहुतांश प्रकरणे ही बौध्द ( महार ) ह्या अनुसूचित जाती प्रवर्गातील आहेत.३५० पेक्षा अधिक राजकीय व्यक्तींच्या जात वैद्यता प्रकरणे अपात्र ठरविली आहेत. या उलट कोणताही पुरावे नसताना जात वैद्यता दिलेल्या १० वरिष्ठ अधिका-यांना जातीचे कोणतेही  पुरावे उपलब्ध नसताना “राजपूत भामटा “ जातीची वैद्यता प्रमाणपत्रे दिली गेली आहेत.अशी कमालीची अनागोंदी राज्यभर सुरु आहे.नाशिक, मुंबई येथील जात पडताळणी समित्यांनी तर उच्च न्यायाल्याचा आदेश असताना देखील अर्जदार विद्यार्थ्यास जात वैद्यता न दिल्याने लाख रुपयाचे दंड न्यायालयाने ठोठावले आहेत.मात्र तरीही राज्यातील जात पडताळणी समित्या सुधरायला मागत नाहीत.कुटुंबातील रक्ताच्या नात्यातील वैद्यता असताना ती अमान्य करणे,निवडणुकीतील प्रस्ताव सहा महिन्यात निकाली न काढणे,सर्व पुरावे असताना वैद्यता नाकारणे किंवा दक्षता पथका मार्फत ही प्रकरणे अडवून ठेवणे अश्या कृत्याने जातवैद्यता पडताळणी समित्या ह्या  मागासवर्गीयांच्या छळ छावण्या बनल्याचे दिसून येत आहे.
त्या करीता  ज्या प्रमाणे अनुसूचित जाती जमाती अत्याचारास प्रतिबंध कायदा (अॅट्रोसिटी) मध्ये अधिकारी लोकसेवका विरुद्ध कर्तव्यात कसूर केल्याने शिक्षेचे कलम ४ आहे, तसे कलम जात  पडताळणी कायद्यात समाविष्ट केल्या शिवाय खोटी वैद्यता प्रमाणपत्रे वाटप बंद होणार नाहीत. अन्यथा आरक्षित घटका साठीचे हे  ‘स्लॉटर होम ‘ अनेकांचे बळी घेत राहतील.
राजेद्र पातोडे
अकोला.
९४२२१६०१०१

कॉंग्रेस पक्ष सेक्युलर आहे का?

कॉंग्रेस पक्ष सेक्युलर आहे का?

- भास्कर भोजने

      गेल्या सत्तर वर्षात कॉंग्रेस पक्षाने जो बुरखा ओढून ढोंग रचले त्याला भारतीय जनता बळी पडली आणि कॉंग्रेस पक्षाला देशातील संपूर्ण सत्तेचे मालक बनविले...!
    देशातील मध्यवत्ती सरकार हे जास्तीत जास्त काळ कॉंग्रेस पक्षाने भोगले आहे....!
    जर कॉंग्रेस पक्षाने संविधानाचे पालन करुन शासन चालविले असते तर,आज देशातील ४२टक्के जनतेला दारिद्र्य रेषेखालील जीवन जगावे लागले नसते...!
    जर कॉंग्रेस पक्षाने संविधानाचे महत्व ओळखून संविधानाचा जागर केला असता तर जनतेला आज आपले हक्क आणि अधिकार समजले असते, आणि पाचशे, हजार रुपयात कुणीही आपले मतं विकले नसते....!
   जर कॉंग्रेस पक्षाने सेक्युलर विचारांचे समर्थन करीत कारभार चालविला असता तर, देशात एवढा प्रचंड जातीयवाद  माजला नसता, आणि राजकारण धार्मिक मुद्द्यावर केंद्रीत झाले नसते...!
    जर कॉंग्रेसने सेक्युलॅरिझम घेऊन वाटचाल केली असती तर अयोध्येतील बाबरी मशिद आज कायम असती...!
    जर कॉंग्रेस पक्ष सेक्युलर असता तर १९८४ ची दंगल व्हायची गरजचं नव्हती...!
  शिख समुदायाची कत्तल थांबवता आली असती...!
   जर कॉंग्रेस पक्ष सेक्युलर आणि पुरोगामी असता तर औरंगाबाद येथील मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतराचा प्रश्न सतरा वर्षे चिघळला नसता...!
   आंबेडकरी समाजाची अपरिमीत हानी आणि तरुणांचे आयुष्य बर्बाद झाले नसते...!
   जर कॉंग्रेस पक्ष सेक्युलर आणि मानवतावादी असता तर ओबीसी समाजाला आरक्षणासाठी ४० वर्षे वाट पहावी लागली नसती...!
    ओबीसी तरुणांच्या चार पिढ्या बर्बाद झाल्या नसत्या....!
   जर कॉंग्रेस पक्ष सेक्युलर म्हणजे निधर्मी असता तर देशात, कॉंग्रेस पक्षाच्या राजवटीत हिंदू, मुस्लिम दंगली झाल्या नसत्या प्रशासनाला कामाला लाऊन कायदा राबविला असता आणि जनतेला सुरक्षितता प्रदान केली असती...!
      मुस्लिम समुदायाचे जिवनमान अधोगतीला गेले , नसते(वाचा सच्चर समितीचा रिपोर्ट.)
   जर कॉंग्रेस पक्ष सेक्युलर आणि बहुजनवादी असता तर धनगर समाजाचे आरक्षण जे केवळ धनगर आणि धनगड या एका शाब्दिक चुकीत साठ वर्षे अडकले नसते...!
     जर कॉंग्रेस पक्ष सेक्युलर आणि बहुजनवादी असता तर धोबी समाज, आदिवासी, भटके विमुक्त, गोंड,गोवारी, आणि कोळी, महादेव कोळी,टकारी यांच्या सारख्या जातींचे आरक्षणासाठी पायपीट करावी लागली नसती...!
      कॉंग्रेस पक्षाने सेक्युलर असल्याचे ढोंग रचुन , विशिष्ट समुहासाठी सत्ता राबविली आणि दलित, मुस्लिम,शिख, बौद्ध आणि ओबीसी बांधवांना पद्धतशीरपणे खेळवले...!
   कॉंग्रेस पक्षाच्या सरकारने जी राज्यघटना जगाने सर्वांगसुंदर म्हणून गौरविली त्या राज्यघटनेत १०२ वेळा दुरुस्ती करून त्यांना हवे तसे कायदे बनविले मात्र साधा संविधान दिवस साजरा केला नाही...!
   कॉंग्रेस पक्षाने गॅट करारावर सही करुन शेतकऱ्यांना मरणाच्या दारात ढकलले...मात्र भांडवलदारासाठी बॅंकांना एन .पी .ए. करायला मुभा दिली...!
   सर्वधर्मसमभाव, समाजवादी, सांसदीय लोकशाहीत नवा भांडवलदार वर्ग तयार झाला त्याला कारणीभूत आहे कॉंग्रेस पक्षाचे धेय्य धोरण...!
    ऊद्योगपती लोकांची संसदीय लोकशाहीवर पकड निर्माण झाली आहे,हा विचित्र योग कसा आणि कुणी निर्माण केला याच्या तपशिलात गेलो तर उत्तर मिळते कॉंग्रेस पक्षाचे धोरण...!
       मित्रहो,२०१९ च्या निवडणुकीत भाजपला थांबवायचे आहे हे निश्र्चित परंतु, भाजपला थांबविण्यासाठी कॉंग्रेस पक्षाला पुन्हा संधी दिली तर आम्ही सत्तर वर्षात काहीच शिकलो नाही असा त्याचा स्पष्ट अर्थ होईल....!
   भाजप आणि काँग्रेस पक्षात काहीच अंतर नाही...!
   दोन्ही पक्षांचं परराष्ट्र धोरण एकच आहे...!
दोन्ही पक्षांचं खाजगीकरण, उदारीकरण आणि जागतिकीकरण धोरण एकच आहे...!
  दोन्ही पक्षांचं भांडवलदारांच्या हिताचं राजकारण सारखंच आहे...!
    फरक केवळ एवढाचं आहे की,एक ऊघडं शत्रुत्वाची भुमिका घेऊन वागतो तर दुसरा छुपा अजेंडा घेऊन आम्हाला फसवितो...!
   दलित ,मुस्लिम, ओबीसी, शेतकरी, कष्टकरी, बहूजन, आदिवासी आणि तमाम सर्वसाधारण जनतेचं प्रतिनिधित्व करणारे पक्ष म्हणून कॉंग्रेस आणि भाजप होऊच शकत नाहीत हे वास्तव जनतेने लक्षात घ्यावे म्हणजे फसवणूक होणार नाही...!
एक सापनाथ तर दुसरा नागनाथ आहे...!
भाजप आणि काँग्रेस वगळून नवा पर्याय शोधल्या शिवाय संविधान सुरक्षित नाही हेही लक्षात घेतले पाहिजे...!
२०१९ साठी नवा पर्याय निवडा ही नम्र विनंती.... जयभीम.

-भास्कर भोजने.

ऍड.बाळासाहेब आंबेडकरांच्या विरोधात काँग्रेस मुस्लिम उमेदवार का देते?

ऍड.बाळासाहेब आंबेडकरांच्या विरोधात काँग्रेस मुस्लिम उमेदवार का देते?

- सुमित वासनिक

1983-84 साली ऍड.बाळासाहेब आंबेडकर पहिल्यांदा अकोल्यातून निवडणूक लढले. या निवडणुकीत काँग्रेस, भाजप आणि बाळासाहेब आंबेडकर अशी तिरंगी लढत झाली होती. ऍड.बाळासाहेब आंबेडकर निवडून येतात अशी परिस्थिती होती. त्यावेळी काँग्रेसने अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन बाळासाहेबांच्या विरोधात जातीयवादी प्रचार केला. आंबेडकर निवडून आले तर शेगावच्या मंदिराजागी मस्जिद बांधतील अश्याप्रकारचा अपप्रचार करण्यात आला होता. या निवडणुकीत ऍड.बाळासाहेब आंबेडकर यांचा फक्त दहा हजार मतांनी पराभव झाला. त्यावेळी बाळासाहेबांच्या विरोधात काँग्रेस कडुन एवढ्या हीन पातळीवरील अपप्रचार झाला नसता तर बाळासाहेब निवडून आले असते.

त्यानंतर 1989 मध्ये पुन्हा लोकसभेच्या निवडणुका लागल्या. 1983 ते 1989 या मधातिल काळात बाळासाहेब शेतकरी, शेतमजूर, भूमी हीन, आदिवासी, ओबीसी आणि इतर सर्वच वंचित समूहांच्या महत्वाच्या प्रश्नांवर काम करत होते. त्यावेळीही या समूहांना सत्तेत वाटा मिळावा यासाठी बाळासाहेब कार्यरत होते. येणाऱ्या निवडणुकीत ऍड.बाळासाहेब आंबेडकर यांच्या या झंझावाता समोर आपला उमेदवार टिकणार नाही असे काँग्रेसला चांगल्या प्रकारे कळले होते म्हणून काहीही करून ऍड.बाळासाहेब आंबेडकर निवडून यायला नको यासाठी आपला उमेदवार पडला तरी चालेल ही भूमिका काँग्रेसने घेतली होती. फक्त बाळासाहेबांना पाडण्यासाठी 1989 मध्ये काँग्रेसने अझहर हुसेन हे मुस्लिम उमेदवार अकोल्यातून दिले होते. त्यावेळी बौद्ध, हिंदु आणि मुस्लिम अशी तिरंगी लढत झाली. काँग्रेसने या निवडणूकित मुस्लिम उमेदवार देऊन निवडणुकीला धार्मिक रंग दिला. याचा परिणाम व्हायचा तोच झाला, अकोल्यातून पहिल्यांदा भाजपचा उमेदवार निवडून आला. अकोल्यात मुस्लिम उमेदवार देण्यामागे बाळासाहेबांना हरविण्यासोबतच बाळासाहेबांच्या सोबत असलेल्या बहुजन, आदिवासी, भटक्यांना आणि मुस्लिमांना दूर करणे हे सुद्धा महत्वाचे कारण होते. हिंदू वि बौद्ध विरुद्ध मुस्लिम असे ध्रुवीकरण करून बाळासाहेबांनी उभी केलेली वंचितांची ताकद संपविणे हा बाळासाहेबांच्या विरोधात मुस्लीम उमेदवार देण्यामागील काँग्रेसचा हेतू होता. काँग्रेसच्या या जातीयवादी खेळी मुळेच अकोल्यात भाजप पक्षाला जम बसविता आला.

2014 च्या निवडणुकांमधे जिकडे तिकडे मोदी लाट असतांनाही अकोल्यातून ऍड.बाळासाहेब आंबेडकरच निवडून येतील अशी परिस्थिती निर्माण झाली होती. यावेळीही काँग्रेसने भाजपला थांबविण्यापेक्षा ऍड.बाळासाहेब आंबेडकर यांना पराभूत करण्यासच जास्त महत्त्व दिले. यासाठी काँग्रेसने 1989 प्रमाणे 2014 मध्ये सुद्धा अकोल्यातून मुस्लिम उमेदवार दिला. महाराष्ट्रातील इतर मुस्लिम बहुल मतदारसंघ सोडून जिथे हमखास पराभव होईल अश्या अकोल्याच्या जागेवरच महाराष्ट्रातील एकमेव मुस्लिम उमेदवार काँग्रेस तर्फे देण्यात आला. अकोला पॅटर्नच्या माध्यमातून बाळासाहेबांनी ओबीसी, मुस्लिम व इतर वंचित अश्या सर्वच समूहांना सत्तेत पोहचविले होते, या समूहाचे बाळासाहेबांना असलेले समर्थन संपविण्यासाठी काँग्रेसने मुस्लिम उमेदवार देऊन पुन्हा हिंदू विरुद्ध बौद्ध विरुद्ध मुस्लिम असा जातीय आणि धार्मिक रंग निवडणुकीला दिला. यावेळेही व्हायचा तोच परीणाम झाला, पुन्हा भाजपचा उमेदवार निवडून आला. ज्यावेळी देशाला भाजप आणि मोदींपासून वाचवायचं राजकारण करायचं होतं त्यावेळी कॉंग्रेसने भाजप समर्थनाचे राजकारण केले.

आता 3-4 महिन्यानंतर लोकसभेच्या निवडणुका पुन्हा होणार आहेत. ऍड.बाळासाहेब आंबेडकर यांनी तयार केलेल्या वंचित बहुजन आघाडिला पुर्ण महाराष्ट्रातून प्रचंड असा प्रतिसाद मिळतो आहे. भाजपच्या देशविघातक विळख्यातून देशाला वाचवण्याच्या उद्देशाने ऍड.बाळासाहेब आंबेडकर यांनी काँग्रेसला युतिसाठि प्रस्ताव दिलेला आहे. पण बाळासाहेबांच्या मागे एकवटलेला वंचित , दलित, मुस्लिम समाज पाहून काँग्रेस पुन्हा एकदा बाळासाहेबांना रोखण्याच्या उद्देशाने अकोला मतदारसंघातून मुस्लिम उमेदवार देण्याची तयारी करीत आहे. मुस्लिम उमेदवार देऊन निवडणुकीतील वातावरण बौद्ध विरुद्ध हिंदू विरुद्ध मुस्लिम असे करणे आणि त्यातून बाळासाहेबांनी वंचितांना सत्तेत नेण्याचे जे प्रयत्न चालविले आहेत ते हाणून पाडणे हेच काँग्रेसचे उद्दिष्ट दिसत आहे. ऍड.बाळासाहेब आंबेडकरांना रोखून त्याआडून वंचित ,मुस्लिम समाजाला सत्तेत जाण्यापासून रोखण्याचे काँग्रेसचे हे कारस्थान आता सर्व वंचित, बहुजन, मुस्लिम जनतेने ओळखले पाहिजे आणि वंचितांना सत्तेत पोहचविण्यासाठी ऍड.बाळासाहेब आंबेडकर यांचे हात बळकट केले पाहिजे.

सुमीत वासनिक

निवडणुका कुणी जिकंल्यात? - राजेंद्र पातोडे

निवडणुका कुणी जिकंल्यात ?

- राजेंद्र पातोडे, अकोला

साऱ्या देशाचे लक्ष लागून राहिलेल्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे निकाल जाहीर झाले. राजस्थान,मध्य प्रदेश, छत्तीसगढ, तेलंगण आणि मिझोरम या पाच राज्यांसाठी घेण्यात आलेल्या या निवडणुकीत काँग्रेसने अनपेक्षितरीत्या जोरदार पुनरागमन केले. राजस्थान व छत्तीसगढमध्ये काँग्रेसने स्पष्ट बहुमतासह विजय संपादित केला तर मध्य प्रदेशमध्येही मोठी मुसंडी मारत सर्वात मोठ्या पक्षाचे स्थान मिळवले. मध्य प्रदेशात काँग्रेस बहुमतापासून केवळ २ जागांच्या अंतरावर राहिली. तेलंगणात अपेक्षेप्रमाणे तेलंगण राष्ट्र समितीने स्पष्ट बहुमत मिळवत मोठा विजय नोंदवला तर मिझोराममध्येही मिझो नॅशनल फ्रंटने स्पष्ट बहुमत प्राप्त केले.
मध्य प्रदेशात गेली 13 वर्षांपासून मुख्यमंत्री असलेले शिवराजसिंह यांना यावेळी जनतेने सत्ता दिली नाही. भाजपसाठी हा मोठा धक्का आहे.तब्बल 15 वर्षांनंतर काँग्रेसने येथे मुसंडी मारली.  कोणत्याच पक्षाला सलग दोनदा सत्ता न देण्याची 25 वर्षांची परंपरा कायम ठेवत राजस्थानातील मतदारांनी काँग्रेस पक्षाला बहुमत दिले आहे. त्यामुळे यावेळी पुन्हा सत्तेवर येण्याचे भाजपचे स्वप्न भंगले आहे.छत्तीसगडमध्ये भाजपचा दारूण पराभव होईल असा अंदाज ‘एक्झीट पोल’नेही वर्तविला नव्हता. पण छत्तीसगडच्या मतदारांनी मुख्यमंत्री डॉ. रमणसिंह यांच्या 15 वर्षांच्या साम्राजाला सुरुंग लावला आणि काँग्रेसला दोनतृतीयंश बहुमत दिले.मिझोराममध्ये काँग्रेसला धक्का बसला असून विधानसभेच्या 40 जागा असलेल्या मिझोराममध्ये काँग्र्रेसची येथील सत्ता गेली आहे. तेलंगणात के. चंद्रशेखर राव यांच्या तेलंगणा राष्ट्र समिती पक्षाने (टीआरएस) पुन्हा सत्ता मिळविली आहे. त्यामुळे मुदतपूर्व सात महिने आधी निवडणुका घेण्याची चंद्रशेखर राव यांची खेळी यशस्वी ठरली आहे. विधानसभेच्या 119 जागा असलेल्या तेलंगणात बहुमतासाठी 61 जागांची आवश्यकता आहे. टीआरएसने तब्बल 87 जागांवर विजय मिळविला.‘टीआरएस’ने असुद्दीने ओवेसी यांच्या एमआयएमबरोबर आघाडी केली होती. एमआयएमला सात जागा मिळाल्या आहेत. दक्षिणेतील या राज्यात सर्वात दारुण पराभव भाजपचा झाला. भाजपला केवळ एक जागा मिळाली आहे. राज्यातील प्रचाराची धुरा स्वत:कडे घेण्याचा मोदी यांचा डाव खरे तर गुजरातमध्ये फसत चालला होता, पण अखेरच्या क्षणी मोदी यांनी गुजरातच्या अस्मितेचा प्रश्न काढून पक्षाला संजीवनी दिली. त्यामुळे भाजप केवळ सात जागा जास्त मिळवून निसटत्या बहुमताने सत्तेवर आला होता. आता मात्र संपूर्ण चित्रच पालटलं.
या राज्यांचा कौल म्हणजे देशातील चार भागांतील जनतेचे मत मानले जात आहे. या पूर्वी काँग्रेसला पंजाबमधील एकहाती विजयाचा अपवाद वगळल्यास पूर्ण बहुमत कुठेच मिळाले नव्हते. कर्नाटकात धर्मनिरपेक्ष जनता दलाच्या मदतीने सत्ता कायम राखली असली तरी एकहाती सत्ता कायम राखता आली नव्हती. पाच राज्यातील निवडणुकीचे निकाल ही आगामी लोकसभा निवडणुकीच्या निकालाची नांदी म्हटले जात आहे.
मी ह्या निवडणुका कडे वेगळ्या अर्थाने पाहतोय. पाचही राज्यांचे निकाल पाहता आगामी  काळात ह्या देशातील एकूणच राजकीय सामाजिक व धार्मिक वीण ही कशी उघड  एक धार्मियच असेल ह्याचाही निकाल ह्या निवडणुकीत लागला असे मी मानतो.भारतीय राज्यघटनेने लोककल्याणकारी राज्याचा पुरस्कार केला आहे. राज्यघटनेतील मार्गदर्शक धोरणांचा उद्देश व्यक्तीचा सर्वागीण विकास साध्य करून कल्याणकारी राज्य निर्माण करणे हा होय. धर्म, जात, वंश, प्रदेश असा कोणताही भेदभाव लोककल्याणाच्या बाबतीत न करता प्रत्येक व्यक्तीचा राजकीय, सामाजिक, आíथक, शैक्षणिक, सांस्कृतिक विकास साध्य करण्याची जबाबदारी शासनाची आहे.सामाजिक, आर्थिक आणि राजकीय न्याय,आचार,विचार, धर्म, श्रद्धा यांचे स्वातंत्र्य आणि राजकीय समानता व समान संधी देण्याचे अभिवचन घटनेने दिले आहे. ही जवाबदारी निवडणुका लढणा-या राजकिय पक्षांच्या जाहीरनाम्यात डोकावत असल्या तरी ह्या पाच राज्यातील राज्यातील निवडणुका मध्ये कुठेही शिक्षण, विकास , रोजगार हे विषयच नव्हते. आचारसंहितेचे पालन सर्व राजकीय पक्षांना तसेच उमेदवारांना बंधनकारक असते. निवडणुकीत सामिल मान्यताप्राप्त अथवा अ-मान्यताप्राप्त राजकीय पक्षाच्या अथवा अपक्ष/स्वतंत्र उमेदवारांनी भाषण, मतदानाचा दिवस,मतदान केंद्र, निवडणुकीचा जाहिरनामा, मिरवणुका, प्रचार, घोषणा व सर्वसामान्य व्यवहार यात काय मर्यादा पाळाव्यात याचे विवेचन केले आहे. निवडणूक आचारसंहिता ही निवडणुका मुक्त व योग्य वातावरणात पार पडाव्यात, त्यात काही जातीय दंगेधोपे अथवा कोणत्याही स्वरुपाचे गैरव्यवहार होऊ नयेत या उद्देशाने आचारसंहितेचे बंधन असताना कुठेही अशी काही बंधने पाळली जात असल्याचे दिसले नाही.पाच राज्यांमधील विधानसभा निवडणुकांदरम्यान नोटाबंदीचा काळा पैशावर काहीही परिणाम झाला ह्या दरम्यान जवळपास 200 कोटी रुपये जप्त झाले. 'अॅटॅक इज बेस्ट पॉलिसी ऑफ डिफेन्स' युद्धशास्त्रातील हे एकमेव हत्यार यावेळी वापरण्यात आले.एकमेकांचे वाभाडे काढताना, पातळी सोडून आरोप-प्रत्यारोप करताना शिक्षण,गरीबी,बेरोगारी, विकास, महिला अत्याचार हे मुद्देच समोर आले नाही. मोदी-अमित शहा यांच्या लोकशाहीतील "इलेक्‍टेड डिक्‍टेटरशिप'चा” विरोधी सोडा अन्य स्वपक्षीय नेत्यांनाही भाजपमध्ये सध्या फार आवाज नाही हेच सांगितले गेले. "सबका साथ, सबका विकास' अशी घोषणा देत सत्तेवर आल्यानंतर भाजप नेत्यांना याचा विसर पडल्याचे सांगताना गेल्या चार वर्षांत गोवंश हत्येवरून अनेकांनी जो काही उच्छाद मांडला त्यावर मोदींनी काही कारवाई केल्याचे दिसले नाही.त्या वर बोलले जात नव्हतं."ना खाउंगा ना खाने दुंगा' असे म्हणणाऱ्या मोदी सरकारच्या काळात कोट्यवधींचा भ्रष्टाचार उघड झाला. बॅंकाना मातीमोल करणारा उद्योगपती विजय मल्ल्या, नीरव मोदी, मेहुल चोक्‍सी दिवसाढवळ्या देश सोडून पळून गेले. त्यांना रोखण्यासाठी सरकारने वेळीच पावले टाकली नाहीत. शेतकऱ्यांना दीडपट हमीभाव देण्याचे आश्‍वासन हवेत विरले. राफेल सह घसरलेली अर्थव्यवस्था असे अनेक मुद्दे  होते.मात्र त्या पेक्षा जात धर्म आणि गोत्र महत्वाचे ठरविले गेले.
गुजरातच्या धर्तीवरच मंदिरांना भेटी, जानवेधारी ब्राह्मण,गोत्राचा केलेला उल्लेख यातून हिंदुत्वाचा पुरस्कार केला. काँग्रेसने मध्य प्रदेशच्या निवडणुक जाहीरनाम्यात गोमूत्र, गोशाळा आदी मुद्दे घेत हिंदू मतदारांना आकर्षित केले.हिंदुत्वाला पोषक वातावरण असल्याने याच मुद्दय़ावर भर देण्यात आला.  "स्टॅटेजिकली' सॉफ्ट हिंदुत्वाची कास धरली गेली. युवक, शेतकरी, कामगार ,महिला,सैनिक, शिक्षण ,आरोग्य आदिवासी अल्पसंख्याक सर्व मागे पडले.राममंदिर, गौरक्षा, पूजा-यांना मानधन हाच देशाच्या जीवनमरणाचा प्रश्न बनविण्यात आला. हे धोकादायक आहे. 
वास्तविक पाहता प्रत्येक निवडणूक ही वेगळी असते. त्या निवडणुकीतील मुद्दे वेगळे असतात. तसेच प्रत्येक मतदारसंघाचे प्रश्न तेथील नेत्यांची भूमिका, पूर्वेतिहास वेगवेगळा असतो. या सगळ्या गोष्टींचा एकत्रित परिणाम निवडणूक निकालामध्ये पाहायला मिळतो. त्याचबरोबर काही काठावरची मते जी वास्तविक निकालामध्ये बहुतांशवेळा महत्वाची ठरत असतात. या प्रकारातील मतदारांच्या कलाचा परिणाम निकालांवर होत असतो. त्याचबरोबर निकालाच्या दृष्टने महत्वाची गोष्ट म्हणजे विद्यमान सत्ताधारी पक्षनेत्यांच्या कार्यपद्धतीबद्दल तयार झालेले जनतेचे मत. तसेच निवडणूक प्रचारातील तात्कालीक मुद्दे कळीचे ठरतात. आजवर भाजपाने साम, दाम, दंड, भेद या सर्वांचा वापर करून सत्ता मिळवली. त्यांच्या उन्मादाला लगाम घालण्यात आला अशी काहीशी मांडणी केली जात आहे. परंतु मागल्या दाराने जात आणि धर्माचा झालेला उघड प्रवेश व त्याचे तितकेच जाहीर समर्थन हाच २०१९ च्या लोकसभा निवडणुकीचा पाया असेल. आणि भाजप असो की काँग्रेस दोनही पक्ष त्याला अपवाद असणार नाहीत. हे देखील आताच्या निवडणुका  सिद्ध झाले आहे.  "आम्हाला भाजप मुक्त भारत नको" हा राहुल गांधींचा नारा ह्या देशात दोनच राजकीय पक्ष असतील एक सॉफ्ट हिंदुत्ववादी काँग्रेस व दुसरी हार्डकोअर भाजप ह्या वर शिक्कामोर्तब झाले आहे. त्या वरून आगामी काळातील राजकीय वातावरणाचा वेध प्रादेशिक पक्षांना घ्यावा लागेल.कारण ह्या देशाचे नाव “भारत “ असताना मोदीसकट राहुल गांधी देखील “हिंदुस्थान” असाच उल्लेख करतात हे लक्षात घेतलं पाहिजे. माझ्या मते ह्या निवडणुका कुठलाही पक्ष जिंकला नसून धर्माधिष्टीहीत विचारधारेची सरशी झाली आहे, देशाची 'धर्मनिरपेक्ष ' राजकीय प्रणाली मात्र पुरती पराभूत हरली आहे.

राजेंद्र पातोडे 
अकोला
९४२२१६०१०१


संदर्भासह स्पष्टीकरण...!

 ** संदर्भासह स्पष्टीकरण...!! " #आजकाल आंबेडकरवादी म्हणवून घेणारे मात्र दलाल प्रवृत्तीचे पोपटासारखे बोलू लागले आहेत". त्याचे स्पष्...