आज उभ्या महाराष्ट्राला एकाच गहन प्रश्नाचे कोडे उकलत नाहीय आणि ते म्हणजे वंचीत बहुजन आघाडीच्या प्रत्येक सभेला रेकॉर्डब्रेक लाखोंची गर्दी कशी जमते? जिथे सत्ताधारी आणि विरोधकांना पंचवीस-पन्नास हजार माणसे गोळा करायला घाम फुटतोय, तिथे बाळासाहेब आंबेडकरांच्या सभेला सलग जमणारा लाखोंचा जनसागर येतोच कसा हा यक्ष प्रश्न सध्या देशातील मनुवाद्यांची झोप उडवीत आहे.बरं ह्या ‘मास चा एकच क्लास आहे’ असेही नाही.अगदी उच्च शिक्षित, गर्भ श्रीमंत, उद्योजक व्यापारी, वकील, प्राध्यापक, इंजिनीयर,आयटीयन्स पासून ते थेट कलावन्त,विचारवंत, सामाजिक कार्यकर्ते, शेतकरी – शेतमजूर ते अगदी सामान्य माणूस अगदी तृतीयपंथी देखील ह्या सभेला आवर्जून हजर असतात.प्रत्येक जिल्ह्यातील पोलीस आणि गुप्तचर खातं देखील हैरान असतं. नेमका आकडा किती द्यायचा हा अंदाजच बांधता येत नाही.
कारण त्या त्या जिल्ह्यात आर्थिक परिस्थिती बेताचीच असलेले भारिप बहुजन महासंघ, वंचीत बहुजन आघाडीच्या घटक असलेल्या पदाधिकारी कार्यकर्ते आहेत.त्यात कुणीही गडगंज संपत्तीचे मालक नाहीत.म्हणावी तशी कार्यकर्त्यांची कुमकही नाही. इतर राजकीय पक्षा प्रमाणे पुरविली जाणारी रसद नाही, कुणीही स्पॉन्सर नाही.कुठेही पावती पुस्तकं नाही, वर्गणी नाही.नियोजन आणि सभेची तयारी म्हणून विशेष काही दिसत नाही.राबणारे हात देखील लिमिटेड दिसतात.तरीदेखील सभेचे भले मोठे मैदानच बुक केले जाते.लोकवर्गणीतून उभा केलेला भव्य स्टेज आणि क्वालिटी साउंड सिस्टीम तसेच सभा लाईव्ह दिसावी म्हणून लावलेले स्क्रीन्स ह्या पलीकडे कोणताही तामझाम दिसत नाही.
वर्तमानपत्रात किंवा मीडियात जाहिराती नसतात.माणसं आणायला वाहनं व्यवस्था नसते, जेवणाची पाकीटं, बिसलेरी आणि मजुरी दिली जात नाही, मैदानात बसायला खुर्च्या नाहीत की रखरखत्या उन्हात डोक्यावर मंडप नाही.तरीही तौबा गर्दी होते.शहर पूर्णवेळ जाम झालेलं असते.महिला पुरुष आणि युवक युवतींनी मैदानं ओव्हरफ्लो होतात.दुपारी २ पासून मैदान भरायला सुरुवात होते ते थेट रात्री सभा संपेपर्यंत कायम असते.प्रत्येक सभेला हा आकडा वाढतच आहे.त्या मुळे संघ भाजपासहीत काँग्रेस-राष्ट्रवादीला धडकी भरली आहे.पूर्वी दखल न घेणा-या मिडीयाला आता ह्या सभा लाईव्ह करावं लागताहेत, कव्हर करावं लागते.सम्पूर्ण महाराष्ट्रात हाच पॅटर्न कायम झाला आहे.राज्यात सलग होत असलेल्या वंचीत बहुजन आघाडीच्या सभांना जनप्रतिसादाचा आलेख वाढत गेलेला दिसतो.नव्या इतिहासाची नांदी ठरणा-या सभांच्या यशाचे गमक काय असावे? हा प्रश्न एकदाच उलगडून दाखवावा म्हणून केलेला लेखन प्रपंच.
इतिहासात प्रथमच ‘वंचित’ ह्या शब्दाची व्याख्या वंचीत समूहाच्या लक्षात आली आहे.आणि ह्या आत्मभानातूनच अनेक लहान लहान जाती समूहांनी आपला आवाज बुलंद करण्यासाठी वंचीत बहुजन आघाडीत ऍड बाळासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाची कास धरली आहे.त्यामुळे आजवर सत्ताधारी म्हणून वावरलेल्या सर्व पक्षांनी आपला ‘वोटींग मशीन’ म्हणून कायम कसा वापरच केला आहे हे मांडलं जाऊ लागले आहे. ७० वर्षात आम्ही सत्ता आणि संपत्ती, संधी वंचित कसे राहिलो हे अनुसूचित जाती, जमाती, ओबीसी, भटके विमूक्त, अल्पसंख्यांक समूहाला ह्या सभेच्या माध्यमातून पटायला लागले आहे.त्यातून दररोज अगदी लहान लहान समूहाच्या संघटना, नेते, कार्यकर्ते ह्या लोकजागरात सहभागी व्हायला लागलेत.कुठलंही आर्थिकच पाठबळ नसलं तरी आपण हा लोकलढा उभा करू शकतो.यशस्वी करू शकतो, हे सभेगणिक सिद्ध व्हायला लागल्याने.कार्यकर्ते आणि पदाधिका-यांचा आत्मविश्वास दुणावला आहे.त्या मुळे ह्या सभा वंचीतांचा संवाद,वंचीतांचा हुंकार,वंचीत एल्गार, आणि वंचितांचा सत्ता संपादन निर्धार ह्या वेगवेगळ्या टायटलखाली गाजायला लागल्यात.
सभेच्या सुरुवातीला ऍड बाळासाहेब आंबेडकर आणि बॅरिस्टर अससोद्दीन ओवेसी ह्यांचेसह नेते मंडळींची एंट्री हा ग्रँड इव्हेंट ठरतो.पांढ-या एसयूव्ही मध्ये असलेले बाळासाहेब,त्यांचे पाठोपाठ आलेला गाड्यांचा काफिला, त्याला एस्कॉर्ट करणारे काळ्या कपड्यातील सोशल कमांडो, गाड्यापाठी उस्फुर्तपणे ध्वज घेऊन धावणारे तरुण आणि स्टेजवरून दिल्या जाणा-या घोषणांना तेवढाच बुलंद प्रतिसाद देणारा लाखोंचा समूह यामुळे सभेत जोश भरतो.अगदी रणमैदानावरील रणभेरी आणि युद्धाची सुरुवात वाटावी असा तो क्षण असतो.स्टेजवर बसलेल्या नेत्यांना बांधलेले विविध रंगांचे फेटे हे तमाम वंचितांचे सामाजिक प्रतिनिधीत्व करीत एक विशिष्ठ रंग आणि धर्माची मक्तेदारी आम्ही मोडून काढलीय हे दिमाखाने सांगत असतो. त्या स्टेजकडे पाहून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्वप्नातील आणि संकल्पनेतील धर्मनिरपेक्ष भारत आणि रिपब्लीकन पक्ष प्रत्यक्षात उतरल्याचे दिसते.
त्या नंतर सभेला साज चढतो तो सभेतील वक्त्यांच्या पोटतिडकीने मांडलेल्या अभ्यासू व जोशपूर्ण भाषणांनी.त्यात देश, संविधान आणि सर्वहारा समूहाचा उत्थानाची भलावण केली जाते.सत्ता हस्तगत करण्याचा निर्धार असतो.येथल्या व्यवस्थेला आपला वाटा मागण्याचा इशारा असतो.वंचीताच्या विविध घटकातील वक्ते त्यांच्या समूहाच्या वेदना मांडताना उपस्थितांच्या काळजाचा वेध घेत असतात.आमदार इम्तियाज जलील आणि खासदार ओवेसी ह्यांची उर्दू हिंदीतील फटकेबाजीने सभेचा नूर बदलून जातो.
सरतेशेवटी एड बाळासाहेब आंबेडकर आपली भूमिका मांडतात.अत्यंत संयमितपणे,अभ्यासपूर्ण भाषणातून आपण हा वंचितांचा लढा का उभा केलाय, तो कसा यशस्वी होणार, त्यासाठी काय पथ्य पाळली पाहिजे, सत्ताधारी होणे म्हणजे काय आणि सत्ता कशी मिळवायची हा मूलमंत्र ते सांगतात.सोबतच भाजप आणि संघ हा कसा विषमतावादी आहे, सनातनी आहे, देशातील मनुवादी व्यवस्थेने देशातील संविधान आणि संवैधानिक व्यवस्था कशी धोक्यात आली आहे.२०१९ लढा जिंकल्याशिवाय देशातील मनुवाद पराभूत होऊ शकत नाही.ही अभ्यासपूर्ण मांडणी करताना काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे खरा चेहरा देखील जनतेसमोर आणतात.
बाळासाहेब बोलायला उभे राहिले की प्रचंड घोषणा व आतिषबाजी होऊन पिनड्रॉप सायलेन्स होतो.जसजसं भाषण पुढे जाते तसे टाळ्यांचा व घॊषणाचा आवाज व प्रतिसाद अधिक वाढतो.ते जेव्हा मोदी आणि संघाला आव्हान देतात तेंव्हा जनतेने अख्ख मैदान डोक्यावर घेतलेलं असते.”स्वतःचा मिडीया स्वतः उभा करा.माझा कार्यकर्ताच माझा मिडीया आहे”.ह्या त्यांचे आवाहनाला अनुसरून लाखोचा समूह स्वतः तल्लीन होऊन ऐकत असताना बाळासाहेबांचा मिडीया म्हणून आपल्या मोबाईलवर हे भाषण लाईव्ह करीत असतात.सोबत प्रबुद्ध भारत ची टीम देखील हे सर्व जनतेपर्यंत पोहचवीत असते.त्यातून इतर जिल्ह्यातील वंचीत समूह ऊर्जावंत होत जातो.
आपल्या जिल्ह्यात वंचीत बहुजन आघाडीची सभा कधी आहे, ह्याची माहिती होताच त्या त्या जिल्ह्यातील सामाजिक संघटना भारिप बमसं,एमआयएम, वंचीतचे पदाधिकारी कार्यकर्ते आम्हीही सत्ताधारी होणार ह्या निर्धाराने कामाला लागतात.त्याला उस्फुर्त प्रतिसाद मिळतो तो महाराष्ट्रातील जनतेचा.हजारो वर्षे माणूसपण नाकारलेल्या आणि व्यस्थेने गुलाम केलेल्या व्यवस्थेच्या मुळावर घाव घालण्याचा निर्धार घेऊन वंचीत समूह सहभागी होत चाललेत.त्यांनी आता ऐक्य, युती, आघाडी ह्या शब्दांना कायमची मूठमाती दिली आहे.’बहुजन सारे एक होऊ, सत्ता आपल्या हाती घेऊ’ या निर्धाराने पेटून उठलेल्या समूहांनी ही आरपारची लढाई लढण्यासाठी जिल्ह्याजिल्ह्यात आपली ताकद वंचीत बहुजन आघाडीच्या पाठीशी उभी केल्याने ह्या विक्रमी सभा सलगपणे यशस्वी होत आहेत.लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड आणि गिनीज बुक मध्ये ह्या सलग सुरु असलेल्या लाखोंच्या सभांची नोंद व्हावी असा प्रयत्न तर होणारच आहे.सोबतच देशाची सत्ता वंचितांची असावी हाच अंतिम लढा यशस्वी करण्याची लोकभावना बाळासाहेबांनी वंचीत समूहात पेरली.त्याच भावनेचे मूर्त रूप म्हणजे लाखोंच्या सभा आहेत.शाहू, फुले, आंबेडकरांचे विचार, एड. बाळासाहेब आंबेडकरांचे नेतृत्व,वंचीत समूहाची साथ, सामान्य कार्यकर्ता आणि सामान्य जनतेचे पाठबळ हेच सर्व ऐतिहासिक सभाच्या विक्रमी उपस्थितीच्या यशाचे गमक आहे.
ह्याचे रूपांतर वंचीत बहुजनांच्या सत्तेत झाल्या शिवाय राहणार नाही हे मात्र निर्विवाद सत्य आहे.
-राजेंद्र पातोडे,अकोला